औंध : येथील रयत शिक्षण संस्थेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयात दहा दिवसांची उद्योजकता विकास कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
या वेळी पुण्यातील वैकुंठ मेहता नॅशनल इंडस्ट्रीज मॅनेजमेंटचे एस. के. वाडकर, प्रा. एम. आर. जोशी, रूपाली जाधव, वैभव जानकर, गणेश धायगुडे, प्रसाद राऊत, क्षितिजा सूर्यवंशी आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. मंजुश्री बोबडे यांसह उद्योजकता विकास समितीच्या चेअरमन प्रा. नलिनी पाचर्णे, उपप्राचार्य डॉ. विलास सदाफळ, प्रा. स्नेहल रेडे, डॉ. सुहास निंबाळकर, डॉ. तानाजी हातेकर, प्रा. सायली गोसावी, प्रा. प्रदीप भिसे, प्रा. हर्षकुमार घळके, डॉ. अतुल चौरे आणि विद्यार्थी उपस्थित होते.
या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाडेकर म्हणाले, ‘कोणताही उद्योग व्यवसाय चालवताना प्रामाणिकपणा महत्त्वाचा असतो, तरच व्यवसाय वाढतो. उद्योग व्यवसाय करण्यासाठी अंगभूत धैर्य असावे लागते. आपण नोकर होण्याऐवजी मालक होण्याची आणि नोकरी देण्याचे उद्दिष्टे ठेवायला पाहिजे. चाकोरीबाहेर जाऊन स्वतंत्रपणे एखादी गोष्ट करणे म्हणजे उद्योग करणे होय. कर्मवीर भाऊराव पाटील आणि लक्ष्मीबाई पाटील यांनी चाकोरीबाहेर जाऊन शिक्षणाचा व्यवसाय केला आणि हजारो लोकांना सुशिक्षित केले.’
प्रा. जोशी म्हणाले, ‘वाढती लोकसंख्या फक्त शेतीवर अवलंबून राहू शकत नाही. त्यामुळे अतिरिक्त लोकसंख्या उद्योग व्यवसायाकडे वळविणे आवश्यक आहे. शेतीमध्ये पिकणाऱ्या कापसापासून छोटे-मोठे उद्योग सुरू करता येऊ शकतात. उदा. कापसापासून गादी, उशी निर्मिती कारखाना काढता येऊ शकतो. बाजारपेठेतील आर्थिक ओघ आपल्याकडे वळवण्यासाठी आपण छोटे-मोठे उद्योग सुरू करायला हवेत. बोरे, आवळे, चिंचा विकणे हासुद्धा एक प्रकारचा व्यवसायच आहे. सिंहगड या ठिकाणी चुलीवरील पिठले आणि भाकरी मिळते. लोकांना काय आवडते, याचा विचार करून त्याचे मार्केटिंग करता आले पाहिजे.’
कार्यक्रमाच्या अध्यक्षा आणि महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. बोबडे म्हणाल्या, ‘रयत शिक्षण संस्था ही क्लस्टर विद्यापीठ होत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांनी सुरुवातीच्या काळात नांगर विकण्याचे कार्य केले आहे. नंतर विविध प्रकारच्या शिक्षण संस्था काढून अशिक्षित समाजाला सुशिक्षित करून एक नवा सुशिक्षित समाज घडविला. उद्योग व्यवसाय छोट्या छोट्या गोष्टींमधून सुरू होतो. महाविद्यालयातील वातावरणात उद्योग-व्यवसायाचे वातावरण निर्माण करण्याचे महाविद्यालय आणि रयत शिक्षण संस्था करीत आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षण घेता घेता स्वतःचा उद्योग व्यवसाय निर्माण करावा. म्हणून दहा दिवसांची ही कार्यशाळा घेण्यात आली.’
या कार्यशाळेच्या दहा दिवसांमध्ये अरविंद पित्रे यांच्या विविध उद्योजक महाविद्यालयात आले आणि त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला.